धाराशिव : भारतीय जनता पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या एका वक्तव्याने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेचे नेते आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असल्याचे सांगत, त्यांनी सरनाईक यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथे महादेव मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान अर्चना पाटील यांनी हे वक्तव्य केले. “माझ्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राग येईल; पण प्रताप सरनाईक यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. त्यांचं कामही सगळ्यात चांगलं आहे,” असे अर्चना पाटील म्हणाल्या.यावेळी त्यांनी पिंपळा खुर्द येथील महादेव मंदिराबाबतच्या स्थानिक श्रद्धेचाही संदर्भ दिला. “पिंपळा खुर्दच्या महादेवाचे दर्शन घेतले की दर्शन घेणारा मुख्यमंत्री होतो,” असे म्हणत त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या क्षमतेकडे सूचकपणे लक्ष वेधले.
अर्चना पाटील यांच्या या वक्तव्यावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनीही लगेच प्रतिक्रिया दिली. “मी एकनाथ शिंदे यांचा सैनिक आहे. तुळजाभवानी मातेच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पालकमंत्री म्हणजेच मुख्यमंत्री, हेच माझं भाग्य,” असे म्हणत सरनाईक यांनी या वक्तव्यावर मिश्कील शैलीत उत्तर दिले.दरम्यान, राज्याच्या सत्ताकारणात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील राजकीय समीकरणांची चर्चा सातत्याने होत असते. मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची क्षमता अधोरेखित केली जात असतानाच आता भाजपच्या स्थानिक नेतृत्वातील अर्चना पाटील यांनी शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांच्याबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
विशेष म्हणजे, धाराशिव भाजपमधील ‘जुना भाजप विरुद्ध नवा भाजप’ या अंतर्गत राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. त्यामुळे अर्चना पाटील यांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा खळबळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या वक्तव्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पाटील कुटुंबीयांकडून कार्यक्रमातील वक्तव्याच्या काही व्हिडिओ क्लिप्स हटविण्यात आल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.अर्चना पाटील यांच्या या वक्तव्यामुळे धाराशिवच्या राजकारणात भाजप-शिवसेना समीकरणांसोबतच मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेलाही नवा राजकीय ट्विस्ट मिळाला आहे. आता या वक्तव्यावर भाजप आणि शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








