धाराशिव जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भूम, परंडा तसेच कळंब परिसरातही रात्रीभर जोरदार पाऊस झाला. परिणामी नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. या कठीण काळात धाराशिव जिल्ह्यातील सर्वच प्रतिनिधी लोकांचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करत असताना पाहायला मिळत आहेत. धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार तानाजी सावंत, माजी आमदार राहुल मोटे हे सर्वच लोकप्रतिनिधी पुराच्या पाण्यात उतरून लोकांची मदत करत आहेत.
दरम्यान, धाराशिव जिल्हावासीयांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील बाहेरील नेते देखील मदत करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरात अडकलेल्या लोकांना मदत पोहोचवण्यासाठी सरकारमधील आणि प्रशासनातील लोकांना विनंती केली आहे. पांडुरंग पिंगळे आणि बाळू गायकवाड यांचे कुटुंबीय पावसामुळे अडकून राहिले आहे. ते ज्याठिकाणी आहेत त्या गावाचा इतर गावाशी संपर्क तुटलेला आहे. धाराशीवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की, त्यांना तातडीने मदत पोहोचवावी. अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
मराठवाड्यातील बहुतांश भागात संततधार सुरु आहे. धाराशीव जिल्ह्यातील लाखी, ता. परंडा येथे पांडुरंग पिंगळे (मो. नं. 9623435954) आणि बाळू गायकवाड (8668293749) यांचे कुटुंबीय पावसामुळे अडकून राहिले आहे. ते ज्याठिकाणी आहेत त्या गावाचा इतर गावाशी संपर्क तुटलेला आहे. धाराशीवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की, त्यांना तातडीने मदत पोहोचवावी. अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे.










