धाराशिव : जिजाऊ चौक ते बोरफळ (राज्य मार्ग क्र. ६८) या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामातील प्रचंड निष्काळजीपणा आणि संथ गतीमुळे अखेर एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणावर आमदार कैलास पाटील यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेत संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा रस्ता अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असून कामाच्या ठिकाणी कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. दिनांक ५ मे २०२६ रोजी रात्री, सांजा गावाच्या पुढे पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही संरक्षण कठडे, इशारे, रेडियम चिन्ह किंवा दिशादर्शक फलक नसल्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने भंडारवाडी येथील ओम दिलीप अंधारे या युवकाची दुचाकी पुलासाठी खणलेल्या खोल खड्ड्यात जाऊन आदळली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, ही पहिली घटना नसून याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी एका स्कॉर्पिओ वाहनाचा अपघात होऊन ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या सलग घटनांनंतरही ठेकेदार व प्रशासनाने कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना केली नाही, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले आहे.
आमदार कैलास पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही संरक्षण कठडे, इशारे, रेडियम चिन्ह किंवा दिशादर्शक चिन्हांचा वापर करण्यात आलेला नाही, ज्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
तसेच, MSIDC मार्फत सुरू असलेल्या या कामासाठी कोणताही अधिकारी पूर्णवेळ नियुक्त नसल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संपूर्ण मराठवाड्यासाठी फक्त एकच कार्यकारी अभियंता नियुक्त असल्यामुळे कामाचा दर्जा राखणे, वेळेत काम पूर्ण करणे आणि प्रत्यक्ष देखरेख करणे अशक्य झाले आहे. संबंधित अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना देऊनही जाणीवपूर्वक अनुपस्थित राहत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या सर्व निष्काळजीपणामुळेच एका निष्पाप युवकाचा जीव गेला असून हा प्रकार सरळसरळ मनुष्यवधासमान गुन्हा असल्याचे आमदार पाटील यांनी ठामपणे म्हटले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार तसेच कामाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, या प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा, नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ठेकेदार व प्रशासनाविरोधात जोरदार संताप व्यक्त करत “निष्काळजीपणामुळे गेलेल्या जीवाची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल उपस्थित केला आहे.











