धाराशिव | प्रतिनिधीभाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या भेटीपासून रोखण्यात आल्याचा आरोप आता धाराशिव भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. या घटनेनंतर पक्षातील नाराजी उफाळून आली असून, निष्ठावंत कार्यकर्ते आणि आजी-माजी पदाधिकारी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, धाराशिवमधील पक्षांतर्गत घडामोडी, कार्यकर्त्यांचा वाढता असंतोष, निष्ठावंत पदाधिकाऱ्यांवरील कथित अन्याय आणि स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर निवेदन वरिष्ठ नेतृत्वासमोर मांडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजपची जुनी फळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा आहे.
“हुकूमशाहीला आता उत्तर मिळणार”
अनिल काळे यांच्या कथित अपमानानंतर अनेक जुने कार्यकर्ते उघडपणे मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत थेट आपली भूमिका पोहोचविल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नेतृत्वाच्या कार्यशैलीमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे.
“३५ वर्षांची निष्ठा… आणि मोबदला अपमान?”
ॲड. अनिल काळे यांनी आरोप केला की, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीच त्यांना मंत्र्यांच्या भेटीपासून रोखले. गेली ३५ वर्षे पक्षासाठी सातत्याने काम करूनही अशी वागणूक मिळाल्याची खंत व्यक्त करत, “आम्ही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत; कुणाचे गुलाम नाही,” असा संतप्त इशारा त्यांनी दिला. हा संपूर्ण प्रकार पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत नेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
अनिल काळे यांनी स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला दुय्यम स्थान देणे, जुन्या पदाधिकाऱ्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणे, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे आणि पक्षाची मूळ विचारधारा बाजूला पडत असल्याचा आरोप त्यांनी केला.याशिवाय, काही अवैध प्रवृत्तींना कथित संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मेघ पाटील यांच्या सोशल मीडिया पोस्टचाही उल्लेख करत, या सर्व बाबी वरिष्ठ नेतृत्वासमोर पुराव्यांसह मांडल्या जाणार असल्याचा दावा त्यांनी केला.
“राणा पाटील पक्षापेक्षा मोठे नाहीत”
“कार्यकर्त्यांचा सातत्याने अपमान, त्यांचे योगदान कमी लेखणे आणि पक्षात एकतर्फी कारभार चालवणे आता सहन केले जाणार नाही. राणा पाटील पक्षापेक्षा मोठे नाहीत. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या संयमाचा अंत झाला असून, या वागणुकीची मोठी राजकीय किंमत पक्षाला मोजावी लागू शकते,” असा इशारा अनिल काळे यांनी दिला.या संपूर्ण घडामोडींमुळे धाराशिव भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला असून, राज्य नेतृत्व या प्रकरणात हस्तक्षेप करणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









