धाराशिव : प्रतिनिधीनवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांवर झालेल्या लाठीचार्जवर धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’, अशा शब्दांत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांवर करण्यात आलेला लाठीहल्ला हा केवळ आंदोलनकर्त्यांवर झालेला हल्ला नसून, भारतीय संविधान आणि लोकशाहीवर झालेला थेट हल्ला असल्याचा घणाघात त्यांनी केला.जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत नसलेल्या मोदी सरकारने आता लाठीच्या जोरावर आवाज दाबण्याचा मार्ग स्वीकारला आहे. हा लोकशाहीचा नव्हे, तर हुकूमशाहीचा चेहरा आहे, असा थेट आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला.आंदोलन दडपण्यासाठी मेट्रो सेवा बंद करून सामान्य नागरिकांनाही वेठीस धरण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. जनतेच्या भावना आणि प्रश्न समजून घेण्याऐवजी विरोधाचा प्रत्येक आवाज चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू असल्याची टीका त्यांनी केली.‘प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर मौन, हीच आजच्या केंद्र सरकारची ओळख बनली आहे,’ अशा शब्दांत आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.लोकशाही व्यवस्थेत संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात. मात्र, सरकारकडून संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला जात असल्याचा आरोप करत आमदार कैलास पाटील यांनी ‘लोकशाहीत संवादाची भाषा असते; हुकूमशाहीत लाठीची,’ असा जोरदार टोला लगावला.जंतर-मंतरवरील घटनेला त्यांनी देशातील लोकशाही गुदमरवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या घटनेवरून आता विरोधकांकडून केंद्र सरकारविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.





