तुळजापूर – आज तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हटलं आहे.
आता भ्रष्ट व्यवस्थेला हद्दपार करण्याची वेळ आली आहे – खासदार निंबाळकर
दरम्यान , महाविकासआघाडीच्या बैठकीत तुळजापूर नगरपालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखालीलढविण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यावेळी ठरविण्यात आले की आघाडीचा उमेदवार हा सर्वसामान्य, प्रामाणिक आणि जनतेच्या हिताचा विचार करणारा असेल. नेत्यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आता भ्रष्ट व्यवस्थेला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिकेत भ्रष्टाचारातून सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार असा खेळ सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न मागे पडले असून अवैध धंद्यांना चालना मिळाली आहे.” या भ्रष्ट व्यवस्थेचा फटका थेट सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर आणि तरुण पिढीच्या भविष्यास बसत असल्याचेही वक्त्यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे तुळजापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांना चालना मिळणार
बैठकीत नेत्यांन सांगितले की, “तुळजापूरकरांनी आता एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ द्यावी. भ्रष्ट सत्तेचा अंत करून स्वच्छ, प्रामाणिक आणि जनतेच्या हिताचे प्रशासन स्थापण्याची वेळ आली आहे.” महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे तुळजापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांना चालना मिळणार असून आगामी निवडणुकीत रंगत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











