हॅलो धाराशिव – धाराशिव शहरातील रस्त्यांचा रखडलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. निविदेतील २०२३-२४ च्या अंदाजपत्रकीय दरानेच ही सगळी कामे होणार आहेत. त्यामुळे आजच्या दराची तुलना केली असता सरकारचे अर्थात जनतेचे जवळपास साठ कोटी रुपये वाचणार आहेत. तुळजापूर आणि नळदुर्गबरोबरच हे काम सुरू झाले असते तर, कदाचित आत्तापर्यंत सत्तर टक्के काम पूर्णही झाले असते. आता कार्यारंभ आदेश झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचं आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले.
शहरातील रस्त्यांच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होणार – आमदार राणाजगजीतसिंह पाटील
धाराशिव येथील प्रतिष्ठान भवन येथे शनिवारी या अनुषंगाने महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील रस्त्यांच्या कामाचा प्रश्न आता निकाली निघाला असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले. या कामांसाठी एकूण १८ महिन्यांची कालमर्यादा असली तरीही कालमर्यादेच्या आत ही सगळे रस्ते अगदी दर्जेदाररित्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पाठपुराव्याला मोठे बळ दिले आहे. असं आमदार पाटील म्हणाले. दरम्यान, शहरातील रस्त्यांच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. आपण स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन धाराशिव येथील भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. तिन्ही मान्यवरांनी अनुमती दिलेली आहे. तारीख निश्चित झाल्यावर तातडीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचंही आमदार पाटील म्हणाले.
शहरातील रस्त्यांसाठी १४० कोटी रूपयांचा निधी मंजूर
महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नेहमीच बळ दिले आहे. आपल्या धारशिव शहरासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांसाठी १४० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नगरविकास मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी विशेष बाब म्हणून धाराशिव शहरासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. शहरातील रस्त्यांसाठी एवढा ऐतिहासिक निधी यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. या निधीच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांचे काम आता वेगात केले जाणार आहे. आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विशेष सहकार्यातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी १४० कोटी रूपयांच्या या विशेष प्रस्तावाला मंजुरी दिली होती. असंही पाटील म्हणाले.











