धाराशिव शहर नगरोत्थान योजनेतून रस्त्यांच्या कामासाठी संभाजीनगरच्या आपल्या लाडक्या कंत्राटदाराला काम मिळाले नाही म्हणूनच आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे यांचा तिळपापड सुरू असल्याची टीका नितीन भोसले यांनी केली आहे. दरम्यान, लाडक्या कंत्राटदाराला काम मिळाले नाही म्हणूनच त्यासाठीच वारंवार यंत्रणेवर तुम्ही दबाव आणला काम, या दबावामुळे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी यावर कांहीही कारवाई केली नाही. परिणामी इतके दिवस काम रखडले. शहरवासीयांना खड्ड्यात रहावे लागले. तुमच्या नाकर्तेपणामुळे शहराची बकाल अवस्था झाली असल्याचा आरोप नितीन भोसले यांनीं केला आहे.
शहराच्या झालेल्या बकाल अवस्थेमुळे नागरिकांना होणारा त्रास वाचवण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाठपुरावा करून १४० कोटी निधी आणला. जे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना सुचले तेच शहाणपण तुम्हाल तुमच्या सत्ताकाळात का सुचलं नाही? पालिका तुमच्याकडे, आमदार तुम्ही, खासदार तुम्ही, राज्याचे प्रमुख तुमचेच नेते असे असतानाही शहरातील खराब रस्त्यांना एक रुपया देखील निधी आपण आणू शकला नाहीत. आणि आता तुम्ही नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल बोलत आहेत. तुम्हाला नागरिकांची काळजी नसून तुमच्या लाडक्या कंत्राटदाराला काम मिळाले नाही याचे जास्त दुःख आहे हे जनतेला ठाऊक आहे असंही भोसले म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलताना भोसले म्हणाले की, बरे झाले तुम्ही एसआयटीचा मुद्दा उपस्थित केला. नसता आम्हीच एसआयटीची मागणी करणार होतो. कारण धाराशिव-बेंबळी-उजनी रस्त्याचे काम टक्केवारीसाठी दोन वर्षे कोण अडवलं.? येरमाळा-कळंब रस्त्याचे काम टक्केवारीसाठी कोण अडवलं.? पवनचक्कीच्या कामात कोणाचे हात काळे झाले आहेत..? कोणाचा भाऊ तेर-तुळजापूर रस्त्याच्या कामात पार्टनर आहे..? कोणाचा भाऊ धाराशिव-औसा रस्त्याच्या कामात पार्टनर आहे..? त्याचा कंत्राटदार कोण आहे..? कोणाचा मामा महावितरणची कामे करतो..? याची देखील एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करण्याचीही धमक आपण दाखवणार का? असा सवालही आमदार आणि खासदार यांना भोसले यांनी उपस्थित केला.











