निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांच्या उद्यानासाठी जागा आरक्षित करून देण्याचा दिला होता शब्द..!
धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित उद्यान विकसित करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका उज्मासबा अझहर पठाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगराध्यक्ष श्रीमती नेहा काकडे यांना दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी निवेदन दिले आहे. निवेदनात नगरसेविका उज्मासबा अझहर पठाण यांनी नगराध्यक्ष नेहा काकडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव नगरपरिषदेत पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या असून हा दिवस शहराच्या राजकीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस आणि दूरगामी निर्णय घेण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांच्या शारीरिक आरोग्य, मानसिक तंदुरुस्ती, व्यायाम, योगासने तसेच सामाजिक संवादासाठी स्वतंत्र व सुरक्षित जागा असणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सध्याच्या काळात महिलांना स्वतःसाठी वेळ देण्यासाठी सुरक्षित जागांचा अभाव असून, त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र उद्यानाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.

प्रभाग क्रमांक 18 मध्ये असलेली मोकळी जागा महिलांसाठी आरक्षित उद्यान म्हणून विकसित करण्यास पूर्णतः योग्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे उद्यान महिलांसाठी विकसित झाल्यास महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल, तणाव कमी होईल तसेच महिलांच्या सामाजिक सशक्तीकरणाला चालना मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
महिलांसाठी स्वतंत्र उद्यान झाल्यास महिलांना सुरक्षित व्यायाम व विरंगुळ्याची सुविधा मिळेल, महिलांमधील सामाजिक संवाद वाढेल, महिलांना स्वतःचा वेळ सुरक्षितपणे घालवता येईल, महिलांसाठी सकारात्मक व सशक्त वातावरण निर्माण होईल,असे विविध फायदे होणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
सदर जागा सध्या गाडी पार्किंगसाठी वापरात असून, ही जागा आदर्श महिलांसाठी उद्यान म्हणून विकसित करण्यासाठी नगरपरिषदेच्या वार्षिक अर्थसंकल्पातून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगरपरिषदेच्या ‘नमो उद्यान योजना’ अंतर्गत या उद्यानाचा विकास करावा, अशी सूचनाही नगरसेविकांनी केली आहे. महिलांच्या कल्याणासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णयास आपण पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही देत नगराध्यक्षांनी या मागणीवर सकारात्मक व तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नगरसेविका उज्मासबा अझहर पठाण यांनी व्यक्त केली आहे.










