धाराशिव–कळंब नगरपालिका निवडणुकीत जाहीर झालेल्या निकालानंतर आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सविस्तर आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत, लोकशाहीतील जनतेचा कौल अंतिम असतो, हे स्पष्ट शब्दांत मान्य केले आहे.
या निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत घेतली. घराघरात जाऊन पक्षाची भूमिका मांडली, तर उमेदवारांनीही आत्मविश्वासाने आणि पूर्ण ताकदीने लढत दिली. मात्र, निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने मनाला वेदना आणि निराशा झाली असल्याची कबुलीही आमदार पाटील यांनी दिली.
सर्वसामान्य घरातील, रस्त्यावर उतरून निष्ठेने पक्षासाठी झटणाऱ्या शिवसैनिकांना आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका आमची होती. मात्र, आजचा निकाल हा अशा कष्टकरी कार्यकर्त्यांच्या मनोबलावर घाव घालणारा ठरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
धाराशिव आणि कळंब शहरातील जनतेविषयी कोणताही आक्षेप नसल्याचे स्पष्ट करत, जनतेने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारतो आणि या पराभवाची संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारत असल्याचेही आमदार कैलास पाटील यांनी नमूद केले.
तसेच, पराभव हा शेवट नसून कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन करत त्यांनी आत्मचिंतन, चुका ओळखणे आणि आवश्यक सुधारणा करून पुन्हा नव्या उमेदीने मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.
“संघर्ष हीच आपली ओळख आहे आणि संघर्षातूनच विजयाचा नवा इतिहास घडवू,” असे प्रेरणादायी शब्द वापरत आमदार कैलास पाटील यांनी कार्यकर्त्यांना नवी दिशा आणि आत्मविश्वास दिला आहे.











