हॅलो धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्पांचा वेग वाढत असताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पांसाठी घेतल्या जात आहेत. मात्र, या प्रक्रियेत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज प्रशासनाला कठोर निर्देश दिले.
मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारा, पोलीस अधीक्षक शफखत आमना, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तसेच पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना सरनाईक म्हणाले,
“पवनचक्की उभारणीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात, त्यामुळे त्यांना कंपनीकडून योग्य मोबदला मिळणे अत्यावश्यक आहे. शासन या प्रक्रियेत समन्वयक म्हणून काम करेल; परंतु मध्यस्थ दलालांच्या सुळसुळाटामुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. काही ठिकाणी गुंडगिरी व धमक्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तक्रारीची वाट न पाहता अशा गुंडांविरोधात सुओ मोटो गुन्हे दाखल करावेत,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांनी पुढे सांगितले की,
जिल्हा प्रशासनाने पवनचक्की उद्योग उभारणीसाठी आवश्यक सहकार्य द्यावे, मात्र शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची खात्री करावी. पवनचक्की प्रकल्पांमुळे धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता येईल, पण या विकासात शेतकऱ्यांचे हित हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीत जमीन हस्तांतरण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सर्व व्यवहार शासनाच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.










