धाराशिव -“भुयारी गटार योजनेच्या नावाखाली धाराशिव शहराचे रस्ते उखडून ठेवले, वाटोळं केलं आणि आता खुद्द तुम्हीच आंदोलन करताय? वाह रे खासदार, आमदार, नगराध्यक्ष… वाह्ह, काय नौटंकी आहे!” असा घणाघात करत शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर केला आहे.साळुंके यांनी स्पष्ट आरोप केला की, “या शहराची वाट लावणारे आजच आंदोलनकर्ते झाले आहेत. भुयारी गटार योजनेतून कित्येक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. कमिशन तुम्हीच खाल्ले. त्या योजनेतील साठवण मालासाठी गोडाऊन तुमच्या शेतात आणि त्याचे दरमहिना १० लाखांचे भाडे तुमच्याच खिशात! ही आहे तुमची ‘सेवा’ आणि ‘जवाबदारी’?”धाराशिव शहरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता रस्त्यांचे काम प्रत्यक्षात सुरू होणार याची जाणीव होताच, याच मंडळींनी आंदोलनाचा नवा तमाशा उभा केला आहे. हे सुद्धा त्यांनी खोडून काढत साळुंके म्हणाले, “ज्यांनी शहराची अधोगती केली, त्यांनी आता आंदोलनाच्या नौटंकीचा नवा खेळ रचला आहे.”सुरज साळुंके यांनी इशारा देत सांगितले “आता तुमची ही नौटंकी चालणार नाही. ही धाराशिवची जनता आहे, सर्व काही पाहते आणि समजते. खोटं बोलून आणि आवाज चढवून सत्य झाकता येत नाही. असं देखील सूरज साळुंखे यांनी म्हटलं आहे”
यानंतर, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रसाद मुंडे यांनी सोशल मीडिया द्वारे उद्धव सेनेवर टीका केली आहे. “बालसेनेचे बाल आंदोलन” अशी टीका केली आहे.
दरम्यान, यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रवी वाघमारे यांनी देखील प्रत्युत्तर देत “आम्ही लोकांसाठी रस्त्यावर, तुम्ही राणा पाटलांची धुनी धुवा” अशी टीका केली आहे.
राकेश सूर्यवंशी यांचा सवाल?
“निवडणुकीच्या तोंडावर नारळ फोडून 10 महिने उलटले तरी रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. जाणूनबुजून निवडणुकीपर्यंत रस्ते होऊ नयेत म्हणून गुत्तेदारांवर दबाव टाकणाऱ्या ‘तो आका’ कोण? हे संपूर्ण शहर जाणतं!” – असा घणाघाती सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राकेश सूर्यवंशी यांनी केला आहे.











