धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पिके वाहून गेली असून काही ठिकाणी नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे शेती जमीन खरडून निघाल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर पंचनाम्याचे काम महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी फोटो आणण्याची सक्ती नसल्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, “शासनाकडून मिळणाऱ्या मदतीत कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. पंचनाम्यासाठी पुरावा गोळा करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. शेतकऱ्यांनी फक्त नुकसानग्रस्त क्षेत्र दाखवायचे असून, फोटो आणण्याची कोणतीही आवश्यकता नाही.”
अनेक ठिकाणी पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून फोटो मागितले जात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सूचना देत हा गैरसमज दूर केला आहे.
जिल्हाधिकारी पुजार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, “गैरसमज बाळगू नका, प्रशासनाला सहकार्य करा. मदत मिळवण्यासाठी आवश्यक ती प्रत्येक काळजी घेतली जाईल.” असं जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी म्हटलं आहे.










