भूम (धाराशिव): धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या नैसर्गिक आपत्तीचा पहिला बळी भूम तालुक्यातील मात्रेवाडी गावाने दिला आहे. गावातील शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय 42) यांनी शेतजमिनीचे नुकसान व वाढते कर्ज यामुळे तणावाखाली येऊन गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
पवार यांच्या शेतजमिनी नदीकाठावर होत्या. दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे जमीन खरवडून गेली, तर सोयाबीन व कांद्याचे पीक पूर्णपणे वाहून गेले. त्यामुळे दोन ट्रॅक्टरच्या कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेतून त्यांनी जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पालकमंत्री प्रताप सरनाईक, आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर तसेच आपत्ती व्यवस्थापन व जलसंधारण विभागाचे मंत्री धाराशिव दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यात ठोस मदत जाहीर होईल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी सामाजिक माध्यमावरून प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सरकारने तात्काळ व सरसकट मदत जाहीर केली, तर तणावाखालील शेतकऱ्यांना आधार मिळेल.”










