धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अभूतपूर्व अशा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके नष्ट झाली असून, शेतातील माती खरवडून गेली आहे. मोठ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तुळजाभवानी मंदिर संस्थानने एक कोटी रुपये तर तेरणा ट्रस्टने ५१ लाख रुपयांची जाहीर केली आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आहेत. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मंदिर संस्थानच्या माध्यमातून मदत करण्याबाबत त्यांनी मंदिर संस्थानचे अध्यक्षांसोबत चर्चा केली होती व त्यानुसार शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय झाला आहे. तेरणा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला जातो. संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही तेरणा ट्रस्टने धाव घेतली असून, ५१ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत. पिके नष्ट झाली, अनेकांच्या घरांची पडझड झाली, संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. या पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. हे लक्षात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी मंदिर संस्थानकडे केली होती. यासह त्यांनी तेरणा ट्रस्टकडूनही मदत जाहीर केली आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थान अन्य मार्गांनीही आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार आहे. अनेकांच्या शेतातील माती खरडून गेली आहे. त्यामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होण्याचा मोठा धोका आहे. यासह पशुधनाचे नुकसान झालेल्या, अन्य नुकसानीचा सामना करावा लागत असलेल्या शेतकऱ्यांना, नागरिकांना मंदिर संस्थानच्या वतीने थेट आर्थिक मदत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.










