धाराशिव :गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः तडाखा दिला आहे. धाराशिवसह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर बनली आहे. शेकडो गावे संपर्कविहीन झाली असून शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांच्या घरात पाणी घुसले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकटसमयी प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असताना, धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी दाखवलेले उदाहरण प्रेरणादायी ठरले आहे.
वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर
अवघ्या एका दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबासाठी हा मोठा आघात होता. अंत्यविधीची वेदना अजूनही ताजी असतानाच, घोष यांनी वैयक्तिक दुःख बाजूला सारले. दुसऱ्याच दिवशी ते थेट पूरग्रस्त भागात पोहोचले आणि प्रशासनाच्या कामकाजात स्वतःला झोकून दिले.
गावकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य
वडगाव सिद्धेश्वर येथील ग्रामस्थांनी पाझर तलावाची पातळी धोक्याची झाल्याची माहिती दिली. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात घेत, सीईओ मैनाक घोष स्वतः घटनास्थळी गेले. त्यांनी तातडीने पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या वेळेवर दिलेल्या सूचनांमुळे गावकऱ्यांमध्ये दिलासा पसरला.
कर्तव्यदक्ष अधिकारी मैनक घोष यांचे सर्वत्र कौतुक
पूरग्रस्तांची मदत, प्रशासनाची समन्वय साधणे आणि उपाययोजना गतीमान करणे या सर्व कामांत घोष यांनी वैयक्तिक वेदना बाजूला ठेवून सहभाग घेतला. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्याकडून घोष यांच्या कार्यपद्धतीचे गौरवोद्गार काढले जात आहेत.
वैयक्तिक दुःख मोठं असूनही, समाजहिताला प्राधान्य
आजच्या काळात वैयक्तिक अडचणींमुळे अनेकदा अधिकारी मागे सरकतात. मात्र, मैनाक घोष यांनी याउलट उदाहरण घालून दिलं आहे. वैयक्तिक दुःख मोठं असूनही, समाजहिताला प्राधान्य देत त्यांनी प्रशासनाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यामुळे त्यांच्या या कार्याचा उल्लेख “कर्तव्यनिष्ठ अधिकारी” म्हणून सर्वत्र होत आहे.










