धाराशिव (प्रतिनिधी): मातोश्रीशी निष्ठा, बाळासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी आणि समाजकारणात नेहमी अग्रभागी — हे वर्णन आहे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते जीवन अशोक जाधव यांचे प्रभाग क्रमांक ११ मधून उमेदवारीसाठी त्यांचे नाव पुढे येताच, नागरिक आणि शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वर्गीय अशोक धोंडीबा जाधव यांच्या घराण्याचा शिवसेना वारसा आजही तितक्याच जोमाने पुढे नेणारे जीवन जाधव हे २००२ पासून सामाजिक, धार्मिक आणि लोकसेवेत सक्रिय आहेत. नवरात्रोत्सवात तुळजाभवानीच्या भाविकांची सेवा, अन्नदान, वृक्षारोपण, मतिमंद मुलींसाठी सेवा, शाळांमध्ये भौतिक मदत — अशा असंख्य उपक्रमांद्वारे त्यांनी आपली ओळख “लोकसेवक” म्हणून निर्माण केली आहे.

श्रीकृष्ण गणेश मंडळ, गवळीवाडा यांनी त्यांच्या कार्याचा गौरव सन्मानपत्र देऊन केला आहे. पक्षाच्या कामात निस्वार्थ भावनेने झटणाऱ्या या कार्यकर्त्याने कधीच पद किंवा तिकिटासाठी मागणी केली नाही. मात्र आता नागरिक आणि शिवसैनिक स्वतःच त्यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी करत आहेत.
प्रभाग क्रमांक ११ हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून, जाधव कुटुंबातील प्रतिनिधीला उमेदवारी देऊन पक्षश्रेष्ठींनी एकनिष्ठतेचा सन्मान करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील यांनीही या मागणीची नोंद घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

“८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालणारे जीवन जाधव हे प्रभागातील लोकांमध्ये विश्वासाचे आणि कार्यतत्परतेचे प्रतीक बनले आहेत. नागरिकांच्या अडचणींना तत्परतेने प्रतिसाद देणे आणि सामाजिक कामात पुढाकार घेणे हीच त्यांची खरी ओळख आहे.
पक्षनिष्ठ, सेवाभावी आणि लोकाभिमुख अशा कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन शिवसेना (उBT) ने सच्च्या शिवसैनिकाचा गौरव करावा, अशी जोरदार मागणी सध्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये होत आहे.












