धाराशिव
धाराशिवमध्ये यंदा गणेशोत्सवाची मिरवणूक भव्य आणि उत्साहवर्धक पार पडली. डीजे-मुक्त गणेश जयंतीमुळे संपूर्ण शहर ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकांच्या तालावर आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात दुमदुमून गेले. या पारंपरिक जल्लोषात राजकारणाची चुरस देखील रंगली. मिरवणुकीदरम्यान शिस्तबद्ध गणेश विसर्जन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे, दोन्ही पक्षांचे स्टेज एकमेकांसमोरच ठोकले गेले होते. भाजपच्या स्टेजवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील उपस्थित होते, तर महाविकास आघाडीच्या स्टेजवर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हजर होते. यावेळी भाजपकडून बक्षिसांची रक्कम सतत वाढवली जात होती, तर आघाडीच्या स्टेजवर शांतता होती. अखेर मल्हार पाटील यांनी ओमराजेंच्या डोळ्यांसमोरच बक्षिसाची रक्कम वाढवत थेट “उजनीच पाणी आणून दाखवलं” या लोकप्रिय गाण्यावर डान्स सुरू केला. अचानक झालेल्या या डान्समुळे वातावरण तापलं आणि प्रेक्षकांच्या जयघोषात रंग भरले. मात्र, हा प्रसंग ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना सहन झाला नसावा. त्यामुळे, त्यांनी संतप्त होत स्टेज सोडला. या राजकीय टक्कर आणि मल्हार पाटील यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, धाराशिवच्या गणेशोत्सवात राजकीय रंग चढल्याची चर्चा जोरदार सुरु आहे.
“कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास” अशी गाणी लावून भाजपकडून जल्लोष
गणेशोत्सव मिरवणुकीच्या दरम्यान जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते आमने-सामने आले होते. शहरातील काळा मारुती परिसरात भाजप आणि महाविकास आघाडीचे स्टेज आमने-सामने होते. भाजपच्या स्टेजवर मल्हार पाटील यांच्यासह अमित शिंदे, नितीन काळे, नितीन शेरखाने, अक्षय ढोबळे, अभिजीत पतंगे यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते होते. तर, महाविकास आघाडीच्या स्टेजवर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते. गणपतीची मिरवणूक आल्यास दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी होत होती. मल्हार पाटील यांचे कार्यकर्ते दंड थोपटून गाण्याच्या तालावर ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्याकडे बघत “कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास” अशी गाणी लावून जल्लोष करत होती. बक्षीसांची रक्कम वाढवली जात होती. 71 हजार रुपयांवरून 1 लाख 11 हजार रुपये बक्षीस मल्हार पाटलांनी वाढवले. मात्र, महाविकासआघाडीकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नव्हता. स्टेजवर फक्त घोषणाबाजी होत होती. बक्षीसांची रक्कम वाढवली गेली नाही किंवा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला नाही.
गणेश मंडळांकडून राणाजगजितसिंह पाटील यांचे कौतुक
मराठा आरक्षणाच्या काळात मुंबईमध्ये मराठा समाजाचे प्रचंड हाल झाले होते. यावेळी, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुंबईत आपल्याला थारा दिला. राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. असं म्हणत गणेश मंडळांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे कौतुक केले. मात्र, काही नेते असे आहेत की त्यांनी साधी फेसबुक वर पोस्ट देखील केली नाही असं म्हणत खासदार निंबाळकरांवर खंत देखील व्यक्त केली.










