धाराशिव – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी लवकरच पक्षाचा राजीनामा देणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. काहीजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात असून, काही कार्यकर्त्यांचा कल भारतीय जनता पक्षाच्या दिशेने असल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे, केवळ महिना भरपूर्वीच जिल्ह्यातील जवळपास ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा अशाच स्वरूपात काही जुन्या व निष्ठावान चेहऱ्यांनीही पक्षाबरोबरचे नाते तोडण्याचे संकेत दिले आहेत. पक्षांतर्गत कुरघोड्या, स्थानिक नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची भावना या नाराजीमागे असल्याचे सांगितले जात आहे. अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पक्ष नेतृत्वाकडे वारंवार मागण्या मांडल्या होत्या, परंतु ठोस निर्णय किंवा कृती नसल्यामुळे ते वैतागले आहेत. भावनिक भाषणं आणि प्रतिमेवर पक्ष चालतो, पण संघटन टिकवायला जमिनीवरील नेतृत्व, संवाद आणि कृती लागते अशी टीका आता कार्यकर्त्यांच्याच वर्तुळात ऐकायला मिळू लागली आहे. या संभाव्य गटबाजीनंतर आणि पुन्हा होणाऱ्या पक्षत्यागामुळे ठाकरे गटाच्या जिल्ह्यातील संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या अनुषंगाने ही परिस्थिती पक्षासाठी अडचणीची ठरू शकते.










