Hello Dharashiv Desk | हॅलो धाराशिव डेस्क
Hello Dharashiv| फेब्रुवारी 2017 नंतर तब्बल आठ वर्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक दिवसांपासून लांबणीवर टाकल्या गेलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलो आहे.
आज जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होणार असल्याने अनेक भावी सदस्यांच्या अशा – आकांक्षा आजच्या निकालावर ठरणार आहेत. गेल्या आठ वर्षात निवडणुका न झाल्याने अनेक माजी सदस्य आणि इच्छुकांनी आपापली राजकीय ताकद टिकून ठेवली आहे. “गुडघ्याला बाशिंग बांधून” तयार असलेले इच्छुक सदस्य आता प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याची तयारी करत आहेत. ही निवडणूक अनेकांसाठी अस्तित्व आणि प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. काहींनी तर दोन निवडणुका झाल्या असत्या, असा अंदाज धरूनच मोठा खर्च करून तयारीही केली आहे.
परंतु गटाचं आरक्षण जुळलं नाही तर अनेक जण निराश होण्याची शक्यता आहे. आजच्या आरक्षणानंतर जिल्ह्यातील निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. एकूण 8 नगरपालिका, 8 पंचायत समित्या, आणि 55 सदस्यांचा जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ जिल्ह्याच्या विकासासाठीच नव्हे, तर अनेक लोकप्रतिनिधीसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे.
भूम, परांडा आणि वाशी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी युती करण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गट नेमक कुणाशी हात मिळवणी करणार, की स्वबळावर लढणार हे आज ही स्पष्ट नाही. कळंब – धाराशिव मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचं सख्य आहे.तर, अजित पवार गटाची ताकद काही ठिकाणी जाणवते. मात्र या ठिकाणी माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा गट ही खामसवाडी शिराढहून आणि मोहा या गटांमध्ये प्रबळ मानला जात आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सरळ सरळ महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. तर उमरगा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची ताकद तुल्यबळ आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने देखील ही लढाई अत्यंत महत्त्वाची आहे.











