हॅलो धाराशिव| Hello Dharashiv
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र, यावेळी त्या केशेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 13 ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषदेच्या 55 जागेवर आरक्षण जाहीर झाले असून, सर्व इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागली आहेत. दरम्यान, अर्चना पाटील यांनी देखील आरक्षण जाहीर होताच 14 ऑक्टोंबर रोजी केशेगाव जिल्हा परिषद गटात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. तसा संदेश देखील व्हाट्सअप च्या माध्यमातून केशेगाव गटात फिरवण्यात आला आहे. त्यामुळे, अर्चना पाटील या तेर मतदारसंघ सोडून केशेगाव गटातून निवडणूक लढवणार आहेत की काय? अशी शक्यता वर्तवली जात आहे.
2012 मध्ये अर्चना पाटील यांनी पहिल्यांदा केशवराव गटातून लढवली होती निवडणूक.
दरम्यान, अर्चना पाटील यांनी पहिल्यांदा २०१२ साली केशेगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी तेर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा पाटील विजय झाल्या आणि थेट जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष बनल्या. यावेळी, तेर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असताना अर्चना पाटील या केशेगाव गटात निवडणूक लढवणार असल्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. दरम्यान, यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे अर्चना पाटील या अध्यक्षपदासाठी देखील इच्छुक असल्याची माहिती आहे. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना उद्या केशेगाव येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, या बैठकीत आगामी रणनिती जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केशेगाव परिसरात सध्या मोठी राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे.











