Hello Dharashiv| तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना दुपारी सुमारास घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांगरदरवाडी येथे इलेक्ट्रिक सबस्टेशनचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी मजूर म्हणून आलेले काही तरुण दुपारी बाराच्या सुमारास कामातून सुट्टी घेत तलावात पोहण्यासाठी गेले. मात्र, पोहताना दोघे तरुण पाण्याच्या खोल भागात गेले आणि बाहेर येऊ शकले नाहीत. स्थानिकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर दोघांना बाहेर काढले, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
मृत तरुणांची नावे राजेश रमेश विश्वकर्मा (रा. मध्य प्रदेश) आणि अखिलेश दयाशंकर गुप्ता (रा. उत्तर प्रदेश) अशी आहेत. दोघेही काही दिवसांपूर्वीच कामासाठी तुळजापूर तालुक्यात दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोघांचे मृतदेह तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
या घटनेमुळे पांगरदरवाडी परिसरात शोककळा पसरली असून, कामगारांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तलाव परिसरात योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.











